अरुण
खोरे
(अरूण
बबनराव
खोरे:
जन्म
१९५४)
प्रथितयश पत्रकार, लेखक. उत्कृष्ट पत्रकारितेचा 'दर्पण पुरस्कार' प्राप्त. 'इंदिरा प्रियदर्शिनी', 'दोन युरोप' ही व “पोरके
दिवस' हे आत्मनिवेदनात्मक पुस्तक प्रसिद्ध.
आईचे छत्र हरवल्यानंतर अनाथाश्रमात वाढलेल्या मुलाने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'पोस्टमन' ची नोकरी स्वीकारली. त्या वेळचे प्रत्ययकारी अनुभव या पाठात कथन केले आहेत.
_____________________________________________________________________________________________
त्या वेळी माझे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. सकाळी कॉलेजात जात होतो. शिक्षण चालू ठेवण्यासाठी मला दुपारची दिवसभरची नोकरी हवी होती; पण ती काही मिळत नव्हती. मिळालीच एखादी नोकरी तर काय काय करायचे याची स्वप्ने मात्र मी त्या वेळी रंगवत असे. माझे एक स्वप्न असे होते-महाविद्यालयाच्या अनेक उपक्रमांतून, स्पर्धांतून मी भाग घेत असे. चांगले नाव मिळत होते. स्नेहसंमेलनात, विविध कार्यक्रमांत भाग घेत होतो. त्या वेळी काही मुले मस्तपैकी ब्लेझरचे कोट अंगावर चढवून मिरवायची. असा एखादा सुंदर कोट अंगावर चढवून मिरवायचे अशी फार फार इच्छा होती.
शेवटी एक 'कोट मिळाला
! तो रोजच मिळू लागला ! हा कोट होता पोस्टमनचा. खाकी डगला !
एफ.वाय.बी.ए.त असताना
वृत्तपत्रातून एक जाहिरात झळकली, 'पोस्टमन भरणे आहेत'.
खरे तर या जाहिरातीने
हरखून जावे असे काही नव्हते; पण म्हटले, कॉलेजची दोन वर्षे बेकारीत गेली. आता या नोकरीसाठी
प्रयत्न करून पाहू. जमले तर जमले.
अर्ज केला. त्यानंतर
लेखी परीक्षा दिली. तीन महिन्यांनी माझी निवड झाल्याचे पत्र आले.मला आनंद झाला आणि
त्या पाठोपाठ पोटात गोळा आला. बापरे! मी ज्या झोपडपट्टीत राहत होतो, त्या भोवतालच्या
इमारती मला भयंकर दिसू लागल्या. शेकडो इमारतींचे चार-चार मजले चढून जायचे आणि तेही
पत्रे वाटत. ही कल्पनाच मला भयंकर वाटू लागली आणि दुसरे म्हणजे आपल्याला लगेच रुजू
व्हावे लागले तर कॉलेज संपलेच! या विचाराने मी बेचैन झालो. मी ही नोकरी न स्वीकारण्यासाठी
अन्य पर्याय शोधले, पण व्यर्थ!
शेवटी रुजू झालो. खाकी
कपडे चढवलेले अनेक पोस्टमन पोस्टातल्या एका हॉलमध्ये दोन्ही बाजूंनी समोरच्या पत्रांच्या
गठ्ठ्यांचे सॉर्टिंग करतं बसलेले. मी खिन्न मनाने एका पोस्टमनशेजारी जाऊन सॉर्टिंग
पाहत उभा राहिलो. पोस्टमन मित्रांचे हात यंत्रवत चालत होते. सुमारे दोन तासांनी सॉर्टिंग
संपले. पत्रांचे गठ्ठे घेऊन सगळे दुत बाहेर निघाले. मी ज्या पोस्टमनसह जाणार होतो,
तोही उठला आणि आमची भ्रमंती सुरू झाली.
अडीच एक तास पत्रवाटपाचे
काम चालले होते. सुदैवाची गोष्ट एवढीच होती, की या पोस्टमनला जो बटवड्याचा भाग होता,
त्यात उंच इमारती फारशा नव्हत्या. मला कामाच्या दृष्टीने बरे वाटले.
कॉलेज साडेसातचं आणि
पोस्टात जावं लागे साडेसहालाच ! दुसर्या दिवशी त्या पोस्टमनला मी सांगितले, की मी
कॉलेजात जाणारा विंद्यार्थी आहे, तर मला लवकर सोडत जा. तोही भला माणूस होता. आम्ही
बटवड्याला बाहेर निघालो, की मला तो पंधरा-वीस मिनिटांनी सोडत असे. मी अदम्य उत्साहाने
कॉलेजला पळत सुटे. अशा वेळी कॉलजचे दिवस काही वेगळेच वाटू लागत. मन मोहरून जायचे. मनाला
तजेला मिळायचा. हे जग आपल्यापासून अलग होऊ नये, आपण इथून दूर जाऊ नये असे वाटत राहायचे.
प्रशिक्षणाचे
दहा दिवस संपले. लवकरच परीक्षा सुरू झाल्या. कॉलेजचे शेवटचे वर्ष सुरू झाले. पोस्टमनच्या
नोकरीची ऑर्डर या वर्षात येऊच नये, असे वाटत होते; पण बी.ए.ची परीक्षा होण्यापूर्वी
मला पोस्टमन म्हणून पोस्टात रुजू होण्याचा आदेश मिळाला. मी गडबडून गेलो.
दोन चित्रे स्पष्ट दिसू
लागली. एक तर हाता-तोंडाशी आलेली पदवी परीक्षा अर्ध्यावर सोडावी लागणार आणि जर ही नोकरी
सोडली तर बी.ए. नंतर पुन्हा नोकरीच्या शोधात उन्हात फिरावे लागणार ! पर्याय एकच होता
पोस्टमनची नोकरी स्वीकारणे हाच! आणि तो मी बिनतक्रार स्वीकारला.
थंडीचे दिवस होते! गारवा
बराच होता. मी सहा वाजताच पोस्टात पोचलो अजून बरेच पोस्टमन यायचे होते. मी पोस्टमास्तरांना
भेटलो. एक-दोन ओळखीचे पोस्टमन होते. त्यांनाही भेटलो. मला शिकवणाऱ्या पोस्टमनने सॉर्टिंग
पद्धतीने करायचे, हे सांगितले. मला सहा नंबरची बीट दिली होती. मला ट्रेनिंग आणि बीटची
माहिती देण्यासाठी एक पोस्टमन माझ्याबरोबर आला.
सुरुवात टपाल ठेवण्याच्या
बॅगेपासुन असते. तीन-चार कप्पे असणारी जाड, खाकी कापडाची बॅग, पत्रे, पाकिटे, आकाराने
लहान-मोठी चौकोनी मासिके, अहवाल यांचे टपाल अशी साधारण विभागणी करून ते ठेवावे लागते.
तसेच आपण कुठल्या मागनि पत्रे वाटणार तो मार्ग निश्चित करून त्याप्रमाणे हे टपाल सॉर्ट
करून एकत्र बांधून घ्यावे लागते. टपाल बॅगेत ठेवल्यावर ती सुतळीने सायकलच्या हँडलला
व्यवस्थित अशी बांधावी लागते, की त्यातून पत्रे पडणार नाहीत आणि ती सहजी काढूनही घेता
आली पाहिजेत.
माझे
पहिले तीन दिवस बरे गेले; पण त्या प्रचंड बीटची धास्ती माझ्या मनाने घेतली. चौथ्या
दिवसापासून स्वतंत्रपणे बटवडा करायचा होता. माझ्या दृष्टीने तो चौथा दिवस ऐतिहासिक
ठरला. पोस्टातून बाहेर पडायलाच मला जवळ जवळ साडेनऊ वाजून गेले होते.
पत्रे टाकत मी पुढे जात
होतो. चुकून राहिलेली परत आणून टाकत होतो. कुत्र्यांना भीत भीत त्यांच्या मालकांना
जोरात हाक मारून देत होतो. वेळ वाढत चालला होता. बारा-एकच्या सुमारास एका साध्या हॅटिलात
थोडा नाश्ता केला. माझ्या एक लक्षात आले, की आजच्या दिवसात ही बॅग काही रिकामी होणार
नाही. दिवेलागण झाली तरी माझे काम चाल होते. साडेसात वाजता उरलेली पत्रे बॅगेत ठेवून
मी पोस्टाकडे निघालो. त्या दिवशी सुमारे दोनशे पत्रे उरली होती. पोस्टमास्तरांनी माझ्याकडून
खुलासा जबाब लिहून घेतला. बहुधा आता आपली नोकरी सुटणार असे मला वाटू लागले; पण नोकरी
राहावी, यापुढे आपण ती चांगली करू असे मन म्हणत होते.
दुसऱ्या दिवशी मला कालच्यापेक्षा
अधिक उशीर झाला. पोस्टमास्तरांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांना माझा रिपोर्ट दिला. ते माझ्यावर
भलतेच उखडले. पत्रांचे वेळेत वाटप करण्याच्या सृचना दिल्या. त्यानंतर मात्र माझे काम
साधारण वेळेत संपू लागले; पण पंधरा दिवसांतच माझी बदली दुसऱ्या पोस्टात झाली.
कामाच्या वाटपाचा परिसर
मोठा नव्हता, पण काम खूप होते. काही कारखान्यांतून ५०-६० रजिस्टर्ड पत्रे, वीस-पंचवीस
मनीऑर्डर्स असे काम असे. कामगारांना बोलवा, इंटिमेशन ठेवा, सह्या घ्या, पोचपावत्या
घ्या असे कागदी घोडे सारखे नाचवत काम चालू असायचे. कामगार नसले, शिफ्ट्स वेगळ्या असल्या
की हे काम दुसऱ्या दिवशी पुन्हा तितकेच वाढे.
आता
माझ्या बी.ए.च्या परीक्षेला फार थोडे दिवस उरले होते. मी रजेचा अर्ज टाकला आणि तो मंजूर
झाल्याचे समजले. मी अभ्यासात मग्न झालो. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पोस्टात रुजू झालो.
या वेळी ज्या परिसरात कॉलेजची चार वर्षे गेली, त्या परिसरात पोस्टमन म्हणून मला काम
करावे लागणार होते. आनंद एकाच गोष्टीचा होता, की कॉलेज ज्या भागात होते त्या भागाची
बीट मिळाली नाही याचा. त्यामुळे काळजी बरीच कमी झाली.
हा सगळा भाग म्हणजे चकचकीत,
शिष्टाचारी, पांढरपेशा समाजाचा. सुस्थापित, सुखासीन असे जग. त्यांची राहणी, त्यांचा
थाट यांना काही वेगळीच खुमारी असे. आपण जिथपर्यंत पोहोचू शकणार नाही, तिथपर्यंत केवळ
पत्र टाकण्याच्या निमित्ताने मी जात होतो. काही बंगल्यांतल्या कुत्र्यांचे आवाज एवढे
भयानक असत, की रखरखत्या ठन्हात अंगावर सरसरून काटा येई.
सोसायट्यांची नावेदेखील
वैभवशाली; समृद्धीशी नाते सांगणारी. त्यात राहणारे लोकही तितकेच संपन्न. आतापर्यंत
बघितलेल्या जगापेक्षा हे सर्वस्वी वेगळे जग होते. इथे माणसे फार कमी भेटायची. माणसांपेक्षा
त्यांच्या वास्तु, बंगले, सोसायट्याच अधिक भेटायच्या.
पोस्टमनच्या कामाची सत्त्वपरीक्षा
असते ती पावसाळ्यात. कसाही पाऊस असो. पत्रवाटप झालेच पाहिजे! 'अहनिंश सेवामहे' हे ब्रीदवाक्य
पोस्टखात्याचे. या ब्रीदवाक्याची सर्वांत जास्त किंमत मोजतो तो पोस्टमनच! रेनकोट घ्या,
छत्री घ्या, भिजावे लागणारच! पत्रे कितीही सुरक्षित न्यायचा प्रयत्न केला, तरीही ती
थोडीफार भिजतात, पण लोक तक्रारी थांबवत नाहीत.
लाळेगुरुजी नावाचे एक
ज्येष्ठ पोस्टमन मित्र म्हणत --''अहो खोरे, पोस्टमनला शंभर मालक! ओव्हरसिअर बोलणार,
पोस्टमास्तर बोलणार आणि पब्लिकही बोलणार! आपण सगळ्यांशी गोड बोलून काम चालवायचं!"'
पावसाळा संपताच मी बी.ए.च्या
उरलेल्या दोन विषयांची तयारी सुरू केली. ऑक्टोबरमध्ये परीक्षा दिली. त्यानंतर बी.ए.
ऑनर्स मिळाल्याचे सांगणारी मार्कलिस्टही मला मिळाली.
याच काळात सर्वांचा थरकाप
उडवून देईल असे तीन खून एकाच वेळी एकाच घरी पुण्यात झाले. तब्बल चार महिन्यांनी पोलिसांनी
आरोपींना पकडले. मी त्याच दिवशी रात्री बसून 'भयासुराच्या छायेतील ते भीषण दिवस' हा
लेख लिहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ या दैनिकाकडे पाठवून दिला. पाचव्याच दिवशी तो लेख
प्रसिदध झाला आणि मला खूप नाव मिळाले. मी आनंदून गेलो. पोस्टात तर कारकून मंडळी माझ्याच
लेखाविषयी चर्चा करत होती. जिथे मी पत्रे टाकत होतो, त्या भागातल्या लोकांची मने गलबलून
गेली होती. आज जो तो माझे नाव जिचारत होता. चहा घेण्याचा आग्रह करत होता.
एका पोस्टमनचे एका लेखकात
संक्रमण होत होते. त्याचा अनुभव मी घेत होतो. लेख प्रसिद्ध झाल्यापासून मला सारखे वाटायचे,
की सकाळमध्येच आपल्याला संपादकीय विभागात काम करण्याची संधी मिळाली तर किती बरे होईल;
पण त्यासाठी वृत्तपत्रविद्येची पदवी आली, त्यासाठी ही नोकरी सोडणे आले. वाटले सोडावी
ही पोस्टमनची नोकरी! पण पुढे काय? दोन्ही वेळच्या जेवणाचे वांधे होतील; पण त्या लेखाने
मनाला एक बळ दिले होते. आपल्यात काही न संपणारे असल्याची जाणीव करून दिली होती.
शेवटी मी पोस्टमनच्या
नोकरीचा राजीनामा दिला. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मी थोडा निर्धास्त होतो; कारण
एक-दोन ठिकाणांहून कामाची आश्वासने मिळाली होती. त्याच आधारावर वृत्तपत्र विद्याप्रशिक्षणासाठी
प्रवेश अर्ज भरला. मुलाखत झाली आणि मला प्रवेश मिळाल्याचे जाहीर झाले. मी बाजी जिंकली
होती.
पत्रकार
होण्याच्या स्वप्नाने मला आजवर न पाहिलेल्या एका वेगळ्याच जगात आणून सोडले होते. आपण
जगाच्या नकाशात जणू एका मध्यवर्ती केंद्रावर उभे आहोत याची जाणीव मला त्या वेळी झाली.